Sunday, June 13, 2010

तुझ्या स्वप्नांची ओंजळ

--- एक दिवस असाही येईल
तुझ्या स्वप्नांची ओंजळ
आणि अपेक्षांची गाठोडी
सुखा सुखी रिती होतील
आज फक्त भरत रहा
तुझ्या स्वप्नांची ओंजळ
आणि बांधून ठेव गाठोडी
झगडण्याच्या आठवणींसह

फक्त पाहत रहा वाट
अविरत अविश्रांत...

एक दिवस असाही येईल
तुझी स्वप्न तुझ्या ओंजळीत
अन्‌ अपेक्षा होतील रित्या कुशीत
तु फक्त सोसत रहा
झेलत रहा क्षण
येतिल तसे येऊ दे
भिजलिस तर भिजत रहा
होरपळलिस तर पोळत रहा
पण, डोळ्यांच्या पापण्या
सदा खुल्या असू दे आशेसाठी
अन्‌ ओंजळ खुली असू दे स्वप्नांसाठी
आज फक्त झेलत रहा
झेलत रहा क्षण
जगत रहा हावऱ्यासारखी
जशी आहेस तशी...

गरज नाही बोलायची
शब्दांना झुलवायची
ओठ खोटं बोलतील कदाचित
फक्त भाषा कळू दे डोळ्यांची
ओंजळ सदा खूली ठेव
अन्‌ गाठोडी उघडी
क्षण फक्त झेलत रहा
क्षण फक्त जगत रहा
जशी आहेस तशी...


फक्त एक काळजी घे
ओंजळ हाती धरताना
बोटांतील फटीला विसरु नको
नकळत सैल सोडायला
तुझ्या स्वप्नांचे कवडसे
झरु दे, पाझरु दे...
तनामनात, श्‍वासाश्‍वासात
अन्‌ धुंद होऊ दे जगणं...
जसं आहे तसं
क्षण फक्त जगत रहा
जसे येतिल तसे
पाऊस आला भिजत रहा
वनवा लागला जळत रहा
विश्‍वास ठेव आशेवर
अन्‌ ओंजळीखालच्या ओंजळीवर
तुझी स्वप्नं शाबूत राहतील
जिवंत राहतील सदा...
भिजलेल्या पानापानातून
होरपळलेल्या काडाकाडातून
अन्‌ अवचित त्यांचा फिनिक्‍स होईल...

(संतोष, 11 जून 2010, 10.00 PM, शनिवारवाडा, पुणे)

तु फक्त जगत रहा

विसरलेत शब्द आता...
भाव त्यांच्या जगण्याचा
तु वाचून बघ एकदा
अर्थ त्यांच्या भंगण्याचा

मुके शब्द वाचशिल कसे
ओठ शांत असताना
श्‍वास कधी खोलणार नाही
बंद पापण्यांच्या भावनांना

वाच हळू हळू
अन्‌ बघ समजतोय का अर्थ
थोडं तुला समजलं तर
थोडं मलाही सांग जमलं तर

गरज नाही शब्दांना
आता अर्थ सांगण्याची
प्रत्येक वेळी घासून पुसून
तोच भाव उगळण्याची

शब्द म्हणजे भाव
शब्द म्हणजे स्वप्नं
शब्द म्हणजे अपेक्षा
अन्‌ शब्द म्हणजे "दुःख'ही

शब्द म्हणजे वणवा
शब्दाने शब्दाला भिडणारा
शब्दांनेच पेटणारा
अन्‌ ओठांनी विझणारा


तु फक्त पाहत रहा
वनवा माझ्या शब्दांचा
अन्‌ चढू दे झालर नवी
तुझ्या स्वप्नांच्या साजाला

तु फक्त पाहत रहा
तु फक्त पेटत रहा
तु फक्त भोगत रहा
तु फक्त जगत रहा
येईल त्या क्षणाला
मिळेल त्या सुखाला...

जगता जगता जगत रहा
भोगता भोगता भोगत रहा
तुझ्या कवेतील आकाशाला
तुझ्या स्वप्नातील ताजव्याला

प्रत्येक पावलाची होईल मोहोर
आणि आज्ञा प्रत्येक श्‍वासाची
फक्त पाऊल पडू दे पुढं
द्याया फाटक्‍या नभा छाया

जगत रहा, झगडत रहा
लढत रहा, मढत रहा सदा
फक्त रिती असू दे ओंजळ
आणि जोडीला खुलं गाठोडं


(संतोष, 11 जून 2010, 10.15 PM, शनिवारवाडा, पुणे)

अजून थोडं चालत राहू

खरं सांगतो
तुला तूच ठावूक नाहीस
जसा मला मी
अजून वाट संपली नाही
अन्‌ दिवस बाकी कासराभर


अजून थोडं चालत राहू
कदाचित, त्या तिथं...
लाल रक्तिमेच्या इथं
सापडेल आपल्याला
माझ्यातील तू... अन्‌ तुझ्यातील मी...

अजून थोडं चालत राहू
अजून थोडं चालत राहू

(संतोष, 11 जून 2010, 11.00 PM, शनिवारवाडा, पुणे)

नात्याचं नको नातं

हात असू दे पाठी

अन्‌ शब्द माझ्या ह्‌दयाशी

नात्याचं नको नातं

फक्त श्‍वास बांधू दे गाठी

Santosh, 12 jun 2010, Shaniwarwada.

तु बोल ना...

तु बोल ना...

तु बोलणार म्हणून
सारं जग थांबलंय
पानं फुलं ऊन वारा
काळजानं नभ पांघरलंय

ओठ थोडे हळूच उघड
वेडं दव पाझरलंय
थेंब मोत्याचे झेलाया
माझं मन मोहरलय

मान वेडावू नको अशी ही
तना मनात चांदणं फुललंय
तुझे शब्द सोसणार नाही
मी शब्दगंधात चिंबलोय

तुझा नाद भिनलाय कानी
अन्‌ गंध हदयाच्या कुपीत
गात्र गात्र गुणगुणतंय
तुझ्या सयीच्या खुशीत

(संतोष, 11 जून 2010, 12.00 PM, शनिवारवाडा, पुणे)

बात

बात,
बात तर खूप आहे...
पण जाऊ दे...
तु सांग...
असं मी म्हणणार
अन्‌ तू बोलायला लागलीस की
माझीच बात होणार...

आता थांबावसं वाटतंय...

मी थांबतो आता

खरंच आता थांबावसं वाटतंय
अनवाणी चालनं...
भुकेलं राहनं...
सगळंच झेंजाट,
आता सोडावसं वाटतंय....

खरंच,
आता थांबावसं वाटतंय


अन्‌ चालावं कुणासाठी
वाट पाहणारंही कोण आहे
चिमण्याची घरट्याला
त्या पिंपळाची साथ आता
सदाची सोडाविशी वाटतेय
खरं सांगतो
आता थांबावसं वाटतंय...

बास झालं हे सॅंडीचं
रोज नवं जगणं
कुणाच्या तरी नावानं
क्षण क्षण रडणं
पालथ्या घड्यावरचं पाणी
आता मोडावसं वाटतंय
खरं सांगतो
आता थांबावसं वाटतंय

पण साली ही आशा खूप भिक्कार आहे
नाद जडला सुटत नाही
नशा काही उतरत नाही
तुच सांग
मी काय करु
दमलोय, थकलोय, विरघळलोय कनाकनानं
खरंच आता थांबावसं वाटतंय...


(संतोष, 11 जून 2010, 11.00 PM, शनिवारवाडा, पुणे)

माझ्या मढ्याची मिरवणूक

हुशSSSSSH

गेला एकदाचा म्हणून
त्यांनी माझी तिरडी सजवली
अन्‌ उचलायची वेळ आल्यावर
माझ्या बायकोलाही मढवली...

तिरडीला माझ्या
नवे बांबू, नवी सुतळी
अंगावर नवी शाल
आणि नाकात नवा कापूस
यांनी मला जाळल्यावर
कोणाचा कोणाला पायपूस...

माझ्या मढ्याची मिरवणूक
टाळ मृदुंगानं गाजली
चितेवर निजवल्यावर
मांगाची हलगीही वाजली
काळ्या बाजाराचं घासलेट
त्यांनी सरणावर ओतलं
फक्त चार आण्याच्या काडीनं
माझं मढं पेटलं...

गेली जाळून मला
सगळी नाती गोती भिकारी
जन्म गेला झुंजण्यात
मी सरणावर राखारी

मनु,
निदान तिने तरी
मागं वळून पहायचं होतं
कपाळावरील कुंकवाला
माझ्यासाठी जपायचं होतं
तु म्हणशील हा मेला
अन्‌ ती झाली विधवा...
आता "फट्ट' कवटी फुटल्यावर
काय अर्थ कुंकवाला
पण खरं सांगू मनु
तिचं उघडं कपाळ
मला मी मेल्याची आठवण देईल
रडेल मी दवांनी
हरवतील अश्रू धुक्‍यात

राहू द्या कपाळी तिच्या
ते कुमकुम रेखलेले
नाहीतर,
माझं मढं रोज मरेल
ते पुन्हा तिरडी सजवतील
अन्‌ उचलायची वेळ आल्यावर
माझ्या बायकोला मढवतील...

(संतोष, 11 जून 2010, 10.00 PM, शनिवारवाडा, पुणे)

माझ्या मनच्या पाखरा

माझ्या मनच्या पाखरा,
शांत हो...
डोळे पुस,
आणि झटकून टाक पिसं...


वळवाच्या पावसानंतर,
जशा जमिनीला भेगा...
तुझी वाट एकटी पाखरा,
नको साद कोरड्या नभा...


फिरवू दे पाठ जगाला,
नवं आभाळ शोध...
तोडू दे नातं जात्यांना,
नवं रान शोध...


जळलं जरी सत्व सारं,
जळत नाही पिळ...
सुत नवं धरण्याआधी
झटक भाळीची धूळ...


माझ्या मनच्या पाखरा,
शांत हो...
डोळे पुस,
आणि झटकून टाक पिसं...


संतोष, 12 जून 2010, रात्री 12.50, कोथरुड, पुणे

हवं कशाला कोण

ही सारी माया आहे,
वयातल्या कायेची...
सागरानं कधी साठवलीत का,
कंपनं प्रत्येक लाटेची...

हवं कशाला कोण तुला,
सुकले अश्रू पुसायला...
ह्दय स्वतःचच ठेव खुलं,
सुख दुःखाच्या कंपनाला...

या बाजारी रित आगळी,
लेची पेची वाट नाही...
पाणी इथं गेल्यावर डोई,
आई पायी पोर घेई...

ह्दय, कंपनं, आपलंपण
जपून ठेव मनात बाई...
इथं सारा व्यवहार
अश्रूंचे कुणाला मोल नाही...

(संतोष 13 जून 2010, 12.00, कोथरुड, पुणे)

आमचं घोडं पेंड खातं...

12 महिने 365 दिवस झुरल्यावर
ती वाह म्हणते...
आन्‌ त्या एका शब्दानेच,
आमची पालखी उठते...

दरवर्षी पावसाळा येतो,
सरींमागून उन पडतं...
हिरव्यागार गवतावर,
आमचं घोडं पेंड खातं...

दर वर्षी सालं असंच होतं,
पावसानं पालवी फुटते...
अन्‌ ती वाह म्हटल्यावर
आमची पालखी उठते...

(संतोष, 12 जून 2010, रात्री 11.30, कोथरुड, पुणे)

बदललाय पावसाळा...

पाऊस आज पुन्हा आला,
तुला मला खिजवायला...
पेटलोच चुकून पाण्याने,
जळण्याआधी विझवायला...


पाऊस म्हणतोय साथ दे,
ह्दयाच्या भाषेला...
झाकशिल कशी बहरात या,
उमलत्या कळीच्या गंधाला...


पण, त्याला तरी काय माहीत,
आपला बदललाय पावसाळा...
आता खिडकीतूनच पाहिन मी,
तुला पावसात भिजताना...


तुझी चिंब पन्हाळी,
कमरेवर त्याचा हात...
तू झेलत राहशील पाऊस
नव्या पावसात नवी बात


माझा पाऊस कौलावर
मी कोरडाच घरात
तुला भिजलेली पाहिन मी
ओल्या पापण्यांच्या आत....

(संतोष, 12 जून 2010, रात्री 9.30, कोथरुड, पुणे)

Saturday, June 12, 2010

अंत नको पाहू...

हा चंद्र तुलाच स्मरतो
चांदण्यावर कुरबुरतो
फक्त तुझ्या सईने माऊ
रात्र रात्र तळमळतो...

चांदण्या आज तप्त लाल
होतेय लाही लाही
तू नसताना गे माऊ
मी चांदण्यात जळूनी जाई...

वाऱ्याने चंद्रही हलतो
नजरेने शुक्र निखळतो
ढग अवचित आभाळी विरतो
मी ही तसाच मौनात मरतो...

सखे माझ्या माऊ...
अंत नको पाहू...

(संतोष, 11.45 pm, 16 मे 2010, पारगाव.)