Sunday, January 10, 2010

पाणगळ

गद्धे पंचविशी ते पस्तीशीतील तरुणांचं जगणं एखाद्या पाणझडी जंगलाप्रमाणे असतं. एकादा का एखादं पान गळालं की, सगळीच झाडं बोडकी. मग हाती राहत फक्त कडाक्‍याच्या झळा झोसत पडून राहणं. तापणं. आतल्या आत कुजणं. शेड्यापासून देठापर्यंत कणाकणानं चुरा होणं. आणि अवचीत कुठून एखादी आशेची सर आली की, याच तावून सुलाखून निघालेल्या चुऱ्याचे खत वापरुन तरारुन उठणं. जंगलाचं तरी बरं... त्याची झडण्याची, तापण्याची, कुजण्याची आणि तरारुन उठण्याची काळ वेळ ठरलेली असते. वयाचा दोष असा की कोणता दिवस पाणगळीचा आणि कोणता अंकुरण्याचा हे सांगता येत नाही. माझा तो दिवस मात्र पाणगळीचाच होता.

खुप कंटाळा आला होता धावपळीचा. रोज नवी सुरवात आणि त्याच दिवशी शेवट. रोज उठतोय आणि पळतोय. कशाच्या मागे, कशासाठी ते ठावूक नाही. स्पर्धा करतोय. लढतोय. सगळ्यांशीच. जगाविरुद्ध लढण्याचं काही वाटतं नाही... पण स्वतःविरुद्धच लढण्याची वेळ आल्यावर काय करायचं. स्वतःला कोणाच्या फुटपट्टीनं मोजायचं. बरं, मोजायचं तरी का ? एक ना हजार सवाल... त्याला कारण काय काहीही पुरतं. मी कोणत्या निराशेत होतो, लक्षात नाही पण ध्यान वेगळंच होतं एवढं खरं. तशातंच ते तिघे भेटले.

रमेश पानसरे. माझा पहिली ते चवथीपर्यंतचा वर्गमित्र. त्यानंतरच्या आमच्या शैक्षणिक आयुष्याचा प्रवास भिन्न वाटांनी झाला. मात्र मैत्री कायम राहीली. अडीच वर्षांपूर्वी तो पुण्यातील प्रसिद्ध आयएलएस लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेवून वकिली जगाच्या बाजारपेठेत दाखल झाला. सध्या एका नामांकित "लिगल फर्म' मध्ये नोकरी करतोय. पगार किमान महिना 20 हजार रुपये. वय वर्षे 26 पूर्ण. 27 सुरु. परवा रात्री अचानक भेटला. भरभरुन बोलला. बोलतच राहीला. पानगळ आणखी वाढली.

कसं आहे ना संतोष, आपण फक्त पळतोय. थांबायला, मागे वळून पहायला वेळचं नाही. अरे, काही नाही... फक्त पळतोय. लहानपणापासून शिकायचं, शिकायचं आणि उर फाटेस्तोवर शिकायचं. कशासाठी तर चांगल्या पगाराची नोकरी मिळाली पाहिजे. पुण्यात राहून जगायचं म्हटलं... तर ते सर्वात महत्वाचंही आहेही म्हणा. इथं महिन्याला 15-20 हजार रुपये कमवायलाच लागतात. एकदा नोकरी सुरु झाली की गाडी आणि फ्लॅटचे वेध लागतात. मग वन बिएचके अपुरा वाटू लागतो. गावावरुन चार लोकं आली तर काय करायचं? त्यासाठी फ्लॅट दोन बिएचकेच पाहिजे. महिन्याला पाच हजार आणखी कमवले तर दोन बिएचके नक्की घेता येईल. मग होतात फ्लॅटचे हप्ते सुरु. काही काळ गेला की चारचाकी गाडी हवी. ती सुद्धा पाच लाखाच्या आतली नको. गाडी काय पुन्हा पुन्हा घेणार का आपण? उशीरा घेऊ हवं तर. पण घेऊन घ्यायची तर 15 लाखाच्या आसपासचीच हवी. अजून भरपूर काही. लक्षातच येत नाही आपल्या की ये सगळं मायावी, व्यर्थ आहे. नक्की कशाच्या मागे धावतोय रे आपणं?

संतोष, माणसाची जात अशी आहे ना... त्याला "थोडं' मिळालं, की लगेच "लई'ची हाव सुटते. गरजा आपोआप फुगतात. मग त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला फुगावं लागतं. नाकी तोंडी फेस येई पर्यंत धावावं लागतं. आपल्याच डोळ्यांसमोर आपली फरपट होत असतानाही संवेदना मारुन सहन करावं लागतं. विसरुन जातो की आपण कोण आहोत. कशासाठी जगत आहोत. किंबहूना जगायचं कसं हेच नेमकं विसरतो. आपलं जगणं आपलं राहत नाही. ते होतं "आपल्या' हप्त्याच्या फ्लॅटचं... हप्त्याच्या गाडीचं... मुलांच्या शाळेच्या फी चं. आयुष्याच्या एका वळणावर हे सगळं लक्षात येतं, पण तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. आयुष्याच्या उतारवयात या पद्धतीने उद्धस्त, उद्विग्न झालेली अनेक लोकं मी गेल्या अडीच तीन वर्षात पाहिलीत. नको वाटतं हे पावलो पावली उध्वस्त होत जाणं.

सालं, हे शहरातील जगणं म्हणजे एकाद्या चक्रव्युहात फसल्यासारखं आहे. एकदा तुम्ही त्यात प्रवेश केला की तुमचं आयुष्य तुमचं राहत नाही. ते खेळणं होतं दुसऱ्याच्या हातातलं. मानकुट मोडल्याशिवाय त्यातून सुटका नाही. अशी शहरी मानमोडी झालेल्या लोकांना निवृत्त (की, बाद) झाल्यावर गावच्या मातीची आणि मोह माया विरहीत जगण्याची ओढ लागते. तुला एक ताजं उदाहरण सांगतो. आपल्याच कॉलेजचे एक माजी विद्यार्थी. अतिशय हुशार. पहिली सहा वर्षे एकही "केस' मिळाली नाही. किरकोळ कामे करत न्यायालये बदलत दिवस काढत होते. शेवटी सात वर्षांनी केस मिळाली. तोपर्यंत त्यांच्या आयुष्याची केस वाचविण्याचे दिवस उलटले होते. अविवाहीत राहीले. आज पंचेचाळीशीत आहेत. पंधरा वर्षांपूर्वी खिशात फक्त कायद्याची पदवी घेऊन फिरणाऱ्या या माणसाकडे आज पुण्यात मोठा प्रशस्त बंगला, चार पाच अलिशान कार आणि भरपूर काही आहे. शहरातील एक अग्रगण्य वकील म्हणून त्यांची ओळख आहे. महिन्याची कमाई किमान विस लाखांच्या पुढे असावी. सगळं काही असूनही आज त्यांना थांबावंसं वाटतंय. सध्या सर्व संपत्ती दान करुन हिमालयात जाण्याचे त्यांचे नियोजन सुरु आहे. त्यांचं म्हणंणही हेच आहे. नकळत चक्रव्युहात अडकलो. फसलो. आत्ता कुठे जाग आलिये. त्यामुळे चक्रवुह तोडण्याची ही संधी मला वाया घालवायची नाही. संतोष, आता तु मला सांग... तु आणि मी काय करायचं ? कसं जगायचं ?

शैलेश देशमुख याची व्यथा रमेश पेक्षा वेगळी नाही. वेगळा आहे त्याचा प्रश्‍न. शैलेस माझ्याबरोबरच दापोली कृषी विद्यापीठातून कृषी पदवी घेऊन बाहेर पडला. त्यानंतर काही काळ त्याने पुण्यात कॉल सेंटरमध्ये नोकरी केली. एमपीएससी, युपीएससीचा अभ्यास केला. परिक्षा दिल्या. सर्व काही करुन झाल्यावर आता घरी पूर्णवेळ शेती करतोय. प्रगतीशिल शेतकरी आहे. वय 26.

काल त्याचा फोन आला. मला लग्न करायचे आहे. आई आणि बहिनीची संमती आहे. शेजारच्या गावची मुलगी पण पाहीली आहे. बी.ए. आहे. दिसायला एकदम चुनचुनीत. तिचा बाप म्हणतो की, आधी गंध लावून लग्न नक्की करा. पण माझा बाप तयार नाही. त्यांचा विरोध आहे. एवढ्यात लग्न नको म्हणतात. आत्तापर्यंत तालुक्‍यातील शेकडो पोरापोरींची लग्न लावली पण स्वतःच्या मुलाचं मन त्यांना कळत नाही. भाऊ तु काहीही कर पण त्यांना समजावून सांग. लग्नाला तयार कर. उद्या माझ्या हातून काही वेगळं घडलं तर मला नाव ठेवू नको.

शैलूचे वडील माझे चांगले मित्र आहेत, त्यामुळे मी त्यांना समजावून सांगावे ही त्याची अपेक्षा चुकीची नव्हती. मात्र या वेळी समस्या नाजूक होती. त्याच्या वडीलांच्या भुमीकेशी मी समरस होतो. कारण, नवरदेव अजून स्वतःच्या पायावर ठामपणे उभा नाही. याच्या हातात एखाद्या मुलीचा हात देणं म्हणजे तिला जाणून बुजून दरीत लोटल्यासारखं होतं. याला माझी तयारी नव्हती. मी त्याला म्हणालोही.. शैलू, तुझ्या पप्पांचं म्हणणं बरोबर आहे. तुला आणखी एक दोन वर्षे दम धरायला काय हरकत आहे. तुझं शेतीतलं करीअर आता कुठे मार्गी लागतंय. एक दोन हंगाम यशस्वी कर मग ते स्वतःहून लग्नाचा विषय काढतील. मी त्यांना समजावू शकत नाही. आणि एवढाच उताविळ झाला असशील, तर तुच समजाव ना.

ते ही करुन पाहीले. दोन्ही गाल आणि हात सुजले आहेत माझे. पुन्हा ती चुक करणार नाही. राहीली गोष्ट करीअरची. ती फुटपट्टी लावली ना, तर माझ्या बापानं तरी कुठं अजून स्वतःचं करीअर घडवलं आहे. आयुष्य शेतीत काढलंय. पण एक पिक धड नाही. तीन वर्षात डाळिंबाची निम्मी झाडं मेली. यांच्याच्यानं एकही सांधता आलं नाही. दर वर्षी डोळ्यांसमोर हजारो रुपयांचं नुकसान होतं. गावच्या राजकारणात मोठा मान आहे म्हणे यांना. पण अजून साधा आमच्या आळीचा ग्रामपंचायत सदस्य होता आलेलं नाही. तुला काय कळणार... दिवसभर शेतात हाडं मोडून घाम गाळल्यावर संध्याकाळी कसं वाटतं ते. प्रश्‍न फक्त लैगिंक समाधानाचा नाही. शंभराच्या दोन तीन नोटा फेकल्या की कुठंही मिळते ते. मला माझ्या स्वतःच्या मानसाचा "सपोर्ट' हवा आहे. आत्तापर्यंत ज्यांना माझं समजायचो तेच परक्‍यासारखी वागू लागल्यावर दुसरं काय करणार. मला नवं नातं हवंय. विश्‍वासाचं. तुला तरी माझं दुखः कसं कळणार म्हणा. पुण्यात सदानकदा पोरींच्या घोळक्‍यात फिरतोस. इथं ढेकळांमध्ये मला दिवस काढावे लागतात. अवघड झालंय सगळंच. एक दिवस तुलाही कळंल, आपण काय गमावलंय ते. मग हळहळ करत बसू नको म्हणजे झालं. बघ, घरी ये आणि सांग बापाला समजून जमलं तर

शैल्याचा फोन बंद झाला तरी त्याचं शब्द मेंदू कुरतडत होते. त्याच्या गनगणीतून बाहेर येतोय न येतोय तोच कर्णपिशाच्च (मोबाईला डॉ. आनंद यादव सरांनी दिलेले मराठी नाव) पुन्हा एकदा घुमू लागले. विशाल तुपे बोलत होता. मी कोथरुड डेपोला आहे. मुलाखत चांगली झाली आहे. खुप भुक लागलिये. दहा मिनीटात कावेरीला ये. विशाल पाडुरंग तुपे. मु. पो. सटाणा, जि. नाशिक. कृषी पदवी व कृषी व्यवसाय व्यवस्थापनाची पदव्युत्तर पदवी (बीएस्सीऍग्री, एमबीए). गेल्या दोन वर्षात सहा कंपन्या बदलल्या. कारणं वेगवेगळी. कधी कंपनीची प्रॉडक्‍ट भंगार तर कधी बॉस. ""साली अपनी जिंदगी झॉंट बन गई है'' हा त्याचा स्वतःचं जगणं सांगण्याचा एका वाक्‍याचा फंडा.

वैताग आलाय यार भाऊ या नोकऱ्यांचा आता. पण केल्याशिवाय पर्याय नाही. विशालनं चिकन करीचा "सिप' घेता घेता सांगायला सुरवात केली. एमबीएसाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते मागे लागले आहेत. पाच सहा वर्षे 25-30 हजाराची नोकरी केल्याशिवाय पर्याय नाही. वर्षाला 4-5 लाख मिळायलाच पाहिजेत. जवळ पैसे साचले तर स्वतंत्रपणे काही तरी करता येईल. सध्या मी टाय घातलेला सुटा बुटातला भिकारी आहे. डोक्‍यात ज आहे, नाही असं नाही. पण ते विकायचं तर जगाच्या बाजारात सध्या मंदी आहे, असं म्हणतात. तुच सांग काय करणार. मुली सांगून येतात. घरच्यांचा आग्रह आहे. मलाही लग्न करावं वाटतं. नाही असं नाही. पण तरीही आणखी चार पाच वर्षे विचार करु शकत नाही. माझ्या वडीलांच लग्न 21 व्या वर्षी झालं. मी 31 व्या वर्षी करणार.

तू बरं केलंस. नोकरीला प्राधान्य देऊन अधी मधी शेतीपण पाहतोस. सगळीकडं बट्‌टयाबोळ आहे. नोकरी वाल्याला वाटतं, शेती म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. एक दाणा पेरला की त्यातून हजार मिळतात. शेतकऱ्याला वाटतं नोकरदाराचं जगणं अलिशान, ऐशोआरामी आणि मान सन्मानाचं आहे. सगळं फालतू आहे यार. मी दोन्हींकडून पोळून निघालोय म्हणून सांगतो. काहीच सुखाचं नाही. सदा टांगती तलवार. नोकरीत "बॉस' पावलोपावली गांड मारण्यास टपलेला, तर शेतीत निसर्ग. ज्याचा कोडगेपणा आणि सहन करण्याची क्षमता जास्त तोच टिकणार. नाही तर आहेच रोजचीच झवझव.

आपला मुख्य दोष काय माहीत आहे का? तो हा की आप मध्यमवर्गीय ते कनिष्ट मध्यमवर्गीय घरांमध्ये जन्माला आलो. कधी कधी वाटतं टीना अंबानीचा कुत्रा म्हणून जन्माला आलो असतो तरी बरं झालं असतं. आपली जगण्याची पातळी आणि जिवघेण्या संघर्षाचं नशीब सटवीनं कपाळावर "परमनंट मार्करनं' कोरुन ठेवलंय. आपण फक्त लढत, झगडत रहायचं. मलो तरी एक नंबर लढलो म्हणायचं. सकारात्मक विचारांची, शुन्यातून गडगंज संपत्ती गोळा केलेल्यांची पुस्तक घोकायची आणि त्यांच्यामागून आपणही आपलं आयुष्य घडवू अशी जिद्द (?) धरुन धावत रहायचं. लढत रहायचं संधी मिळविण्यासाठी... स्वतःविरुद्ध, कुटुंबाविरुद्ध, बॉसविरुद्ध, कंपनीविरुद्ध, समाजाविरुद्ध आणि बऱ्याच कशाकशाविरुद्ध. महाराजांचे मावळे ना आपणं. लढायचं. लढण्यातील आणि त्यातील जगण्यातील सौंदर्य भोगायचं. जगण्यावर बलात्कार झाले तरी.

खोलीवर आलो. आत्तापर्यंत झाली एवढी पाणगळ खूप झाली होती. दररोज संध्याकाळी असतं त्यापेक्षाही अधिक डोकं सुन्न झालं होतं. राहून राहून कावेरीवाल्याच्या कोंबडीची आठवण होत होती. बिचारी आमच्यासाठी आज फुकाची बळी गेली. माझ्या तीन मित्रांपाठोपाठ ती माझा चवथा मित्र किंवा मैत्रीण असती तर तिची पाणगळ कशी असती? तिनेही तिच्या जगण्याची अतृप्तताच घोकली असती का आमच्यासारखी. की पक्षी म्हणून स्वतःचा अल्पजिवीपणा स्विकारुन काही नवी दिशा असती तिची? पुन्हा विचार आला... अरे ती कसले दुखः करणार. तिच्या आयुष्याचा तर महोत्सव झाला. कदाचीत आपण नाही तर दुसऱ्या कुणी तरी खाल्लीच असती ना. नाहीतर तिचा "चिकन करी' ऐवजी "भुर्जी मसाला' झाला नसती कशावरुन. कारण काही का असेना... ती जन्माला आली. तिच्या वाट्याला आलेलं भलं बुरं आयुष्य धुंद होऊन जगली. कोणापुढं रडली नाही की दुसऱ्याला दोष देत बसली नाही. बरं... मेली तरी अजून माझ्या डोक्‍यात अजून कलकलाट करतेय. पाणगळ आणि अंकुरणं हाच जर जगण्याच्या उत्सव आणि महोत्सव असेल तर हे तरी वेगळं काय आहे. रमेश, विशाल, शैलेश आणि कोंबडीला अंकुर फुटले होते. कदाचीत आता माझी वेळ आहे...

4 comments:

mani said...

"pangal" !!!!! chan lihili ahes!me too started feeling like all other protagonists of your story, especially like hen. pak pak pakak!!!

pangal madhe "na" "nalacha" asato "banacha nave!"

Santosh Dukare said...

Dear, maza na kachha aahe. post kelele 1 st proof aahe. tyat ajun sudharna & Proof Reading baki aahe... Jase manat aale tase lihit gelo basssss..........

Unknown said...

hats of ..santosh
u hav tremendous power of thinking which helps to u also in writing this kind of story..
i really like this.
i also going through same condition wht they three r going...

BinaryBandya™ said...

jabara