Wednesday, May 5, 2010

मी शांत राहीन

तुम्ही म्हणाता ना... शांत हो !
चालेल, होईल मी शांत
आणि शांतच राहील अखेरपर्यंत

मोकळा झालो तरी
पोरका झालो तरी
माझं घर लूटलं तरी

शांतच राहील मी...
अजिबात त्रागा करणार नाही

आहे मी शांत आणि संयमी
गातील लोक माझ्या संयमाच्या गाथा
म्हणतील आहे स्थितप्रज्ञ यासम हा
होतील माझ्या गितेची पारायणे
शांतपणे... संयमाने... घराघरात

परिस्थिती न बदलता, संयमानं
निर्जिवपणे जगल्याबद्दल...
उभारतील माझे पुतळे,
चौका चौकात, गावा गावात

मग मानसांनी शोधलेल्या माझ्या कर्तृत्वावर
विष्ठा करतील संयमी कबुतरं
अन्‌ माझ्या स्वाभिमानाच्या पिंड पडेल नदीवर

तरीही मी शांत राहीन,
तेव्हाही मी शांत राहीन
खरंच मी शांत राहीन... अखेरपर्यंत

(संतोष, 5 मे 2010, शनिवारवाडा, पुणे)

1 comment:

vishal said...

Mitraa..tuzi kavita faar sunder ahe. Mala tuzi aswasthata prachand manaswi vatali. Asach lihit raha.