Wednesday, September 30, 2009

कॉर्पोरेट

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे औरंगाबाद बसने एव्हाना नगर ओलांडले होते. रात्रीचे सव्वाबारा वाजले होते. दोन तासांचा प्रवास होऊनही अद्याप रफिकच्या डोळ्याला डोळा लागला नव्हता. सताड उघड्या डोळ्यांनी बाहेरच्या काळ्या नगरी प्रकाशाशी त्याचा मुक संवाद सुरु होता. गाडी तिच्या आणि त्याच्याही अंतिम स्थळी पोचण्यास अद्याप आणखी किमान तीन तासांचा अवधी होता. तोपर्यंत रफिकच्या डोक्‍यात विचारांचे पाळणे हलतच राहणार होते.

रफिक मोमिन. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्‍यातील निमगाव गावातील शेतकरी शिक्षकाचा ऐन पंचविशितील एकूलता एक कृषी पदवीधर मुलगा. कुटुंब धर्माने मुस्लिम असले तरी घरात कुरणाएवढाच किंवा काकणभर त्याहून सरस गिता, ज्ञानेश्‍वरी आणि गाथेला स्थान आणि मान. वडील माध्यमिक शिक्षक. गिता अभ्यासात त्यांचा हात उत्तर पुणे जिल्ह्यात कुणी धरत नाही. गितेवरील व ज्ञानेश्‍वरीवरील त्यांची रसाळ विवेचनं ऐकत रफिक लहानाचा मोठा झाला. घरी पाच एकरावर द्राक्ष बागा, एक लहानचा डोंगर, त्याच्या अंगाखांद्यावरील दोनशे सिताफळाची आणि अगणित करवंदाची झाडं. दोन म्हशींमुळं घर कायम दुध दुभत्यांनं भरलेलं. वावरातील ढेकळांनी गुडघे आणि घोटे फोडून घेत चार बैली नांगर हाकता हाकता रफिक शेतीची धुळाक्षरं शिकला.

कृषी पदवी शिक्षणासाठी तो कोकण कृषी विद्यापीठात दाखल झाला. कोकणातील निसर्गरम्य रत्नागिरी जिल्ह्यातील केशवसुत, साने गुरुजी यांच्या पदस्पर्शाने पुलकीत झालेल्या दापोली, हर्णेच्या सागरी भुमीत चार वर्षांच्या कृषीमय वास्तव्याने त्याच्यातील संवेदनशिलता, भावनीक हळुवारपणा अधिकच कोमल झाला. पदवीनंतर या संवेदनशिलता चटके देवू लागली. राज्य सेवेतून कृषी विभागात वरिष्ठ अधिकारी पदावर नोकरी मिळवायची आणि शेतकरीभिमुख प्रशासन राबवून शेतकऱ्यांचं जगणं सुसह्य करायचं हे त्याचं स्वप्न त्यासाठी रात्रीचा दिवस करायची तयारी. मात्र राहुरी कृषी विद्यापीठात एक वर्षे पॅरासाईट म्हणून रात्री जागवूनही शासन राज्य सेवा परिक्षा जाहीर करत नसल्याने रफिकनं एमबीए करण्याचा निर्णय घेतला.

पुण्यातील प्रतिथयश खासगी महाविद्यालयातून कृषी उद्योग व्यपस्थापनात मार्केटींग मध्ये स्पेशलायझेशन करत तो एमबीए झाला. शेवटच्या सहामाहीत किर्ती ऍग्रो इंडस्ट्रीज या राज्यातील प्रमुख खते, बियाणे व किटकनाशके उत्पादक कंपनीने मंदीच्या काळातही त्याला पाच लाख रुपये वार्षिक पगाराचा प्रस्ताव दिला. ऐन मंदीत दोन लाखांपेक्षा जास्त पगाराची नोकरी मिळविलेला तो महाविद्यालयाचा एकमेव विद्यार्थी ठरला. औरंगाबाद विभागात त्याची नेमणूक झाली. निकाल हाती पडल्याबरोबर आता नोकरीत रुजू होण्यासाठी तो औरंगाबादला निघाला होता.

रफिक औरंगाबादेत दाखल झाला तेव्हा पहाटेचे साडेतीन वाजले होते. कंपनीच्या मुख्यालयात जावून पहाटे चार वाजता तो हॉटेलमध्ये कंपनीने बुक केलेल्या आपल्या रुममध्ये दाखल झाला. आपला हुद्दा काय, नक्की काम काय करायचे आहे. हाताखाली किती लोक असतील, बॉस किती आणि कसे आहेत, याबाबत त्याच्या डोक्‍यात विचारांचे थैमान चालले होते. कंपनीने अद्याप कसलीच कल्पना दिली नव्हती. रुजू झाल्यावरच जबाबदारी देण्यात येणार होती. रुजू झाल्याचे पत्र हाती पडल्यानंतर त्याने त्यावर नजर फिरवली आणि त्याच्या हाताला थरकाप सुटला. नकळत ओठांतून शब्द सुटले... अरे बापरे !

कंपनीच्या बियाणे विक्री विभागाचा औरंगाबाद विभागाचा विभागप्रमुख म्हणून त्याच्यावर कामाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. कंपनी प्रामुख्याने बिटी कापूस, सोयाबिन आणि पालेभाज्यांचे बियाणे उत्पादित करत होती. बियाण्याची सुमारे 80 टक्के विक्री औरंगाबाद विभागात होती. शेतकऱ्यांमध्ये कंपनीची चांगली प्रतिमा होती. मात्र दर वर्षी विक्रीचे अव्वाच्या सव्वा उद्दीष्ट, कामाचा अति ताण, सुमारे दहा जिल्ह्यांमध्या सततची भ्रमंती व विक्रीवाढीचा ताण, विक्रीत घट आल्यास वरिष्ठांच्या शिव्या प्रसंगी पगारात कपात यामुळे या ठिकाणी काम करण्यास कोणीही उत्सूक नव्हते. अगदी कंपनीत 20-20 वर्षे काढलेले वरिष्ठ व्यवस्थापकही औरंगाबादकडे फिरकण्यास तयार नव्हते. त्यामुळे कंपनीने नवीन कार्यक्षम व्यवस्थापकाची निवड केली होती. आत्तापर्यंत घरच्या वावरात नांगराच्या मुठी हाती धरणारा रफिक आता किर्ती सिडच्या मार्केटींग विभागाच्या मुठी आवळणार होता. वावर नांगरण्यासाठी चार बैल व त्यांना ढिले पडू न देण्यासाठी हाती आसूड एवढी सामग्री होती. कंपनीत त्याच्या नियंत्रणाखाली 10 जिल्हे व त्यातील सुमारे 100 माणसे, त्यांना ढिले पडू न देण्यासाठी एक चारचाकी गाडी त्याच्या हाती सोपविण्यात आली. कंपनीच्या उत्पादनांच्या विक्रीत सातत्य राखतानाच किमान 10 टक्के वाढीचे उद्दीष्ट त्याला देण्यात आले होते. विशेषतः बिटी बियाण्याच्या विक्रीमध्ये वाढ करण्याचे काम त्याला करायचे होते. याबरोबरच वरिष्ठ आणि कनिष्ठांशी योग्य सुसवाद राखत त्याला स्वतःचे करीअर घडवायचे होते. हेच मुख्य आव्हाण होते. कारकिर्दीच्या सुरवातीला एकढ्या मोठ्या आव्हाणाला सामोरे जाण्याचे फायदे आणि तोटे दोन्हीही माठे असतात. असे उद्दीष्ट साध्य करताना यश मिळाले तर ते आयुष्य घडविते आणि अपयश आले तर ते आयुष्यातून उठविते. जॉयनिंग लेटरवर सही करताना त्याच्या हाताला कंप सुटला तो यामुळे. तरीही उद्दीष्ट पुर्तीसाठी दात ओठ खावून त्याने सही केली. कामाला सुरवात झाली.

पहिले दोन दिवस सर्व सहकाऱ्यांशी ओळख, यापुर्वी झालेले काम, कामाची पहाणी, बैठका यामध्येच गेली. अद्याप त्याचे बावरलेपण पुरते गेले नव्हते. अशातच रफिकच्या कामाचा तिसरा दिवस-रविवार उजाडला. कंपनीच्या मार्केटींग विभागाचे राज्य प्रमुख डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी आपल्या सेवानिवृत्तीबद्दल संध्याकाळी एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये कंपनीतील मार्केटींग विभागाच्या जिल्हा ते राज्य पातळीवरील सर्व सहकाऱ्यांसाठी विशेष पार्टीचे आयोजन केले होते. पार्टीचे निमंत्रण मिळाले आणि रफिकच्या डोक्‍यात ज्वाच्या ताटांना अमरवेलाने गुंडाळून न सुटणारा गुंता करावा, त्याप्रमाणे विचारांचा गुंता झाला. पार्टीला कपडे कसे घालायचे, बुटाचे फाटलेले सोल कसे लपविता येईल, काटे आणि चमच्यांनी हातात डिश धरुन कसं खायचं असे एक ना अनेक अशा अनेक प्रश्‍नांची बांडगुळं डोक्‍याला लटकू लागली, पार्टी संपल्याशिवाय ही बंडगुळं निघणं शक्‍य नव्हतं.

रात्री नऊच्या सुमारास तो हॉटेलच्या गार्डनमध्ये पोहचला. एव्हाना बहुतेक सर्वजन दाखल झाले होते. रफिकला आपल्या हाताखालील 10 जिल्हा प्रतिनिधी आणि वरिष्ठ व्यवस्थापक वगळता सर्वच जण अनोळखी होते. तो पोहचल्याबरोबर त्याचे जिल्हा प्रतिनिधी त्याला अभिवादन करुन गेले. तसा तो पार्टीत उपस्थित सर्व व्यवस्थापकांमध्ये वयाने सर्वात लहान होता. वरिष्ठांना नमस्कार करुन तो विभागिय व्यवस्थापकांच्या कळपात सहभागी झाला. पार्टीला सुरवात झाली होती. पार्टीत तीन गट पडले होते. सर्व जिल्हा प्रतिनिधी एका लाबलचक टेबलाभोवती गोळा होऊन मद्याचे पेले भरविण्यात मश्‍गुल होते. विभागिय व्यवस्थापकांचा गप्पांचा आणि फिरक्‍यांचा मौसम ऐन भरात आला होता. गेल्या हंगामात टारगेट पूर्ण करण्यात कोणाची कशी फाटली, जालन्यात वापराची अंतिम मुदत संपलेली बिटीची पाकीटे कशी खपविली, खतांसोबत किटकनाशकांचे लिंकिंग चांगल्या पद्धतीने केल्यास विक्री किती वाढू शकते, आदी विषयांना उधाण आले. राज्यपाळीवरील निवडक व्यवस्थापक मंडळी हिरवळीवर मांडलेल्या बांबुच्या आकर्षक खुर्च्यांमध्ये बसून मद्याचे घोट रिचवत रिचवत गंभिर चर्चांमध्ये मग्न होती. स्टार्टरच्या वाट्या काचेच्या ताटल्यांमध्ये नाचू लागल्या होत्या. बसल्या बसल्या एका हातातील चमच्याने चिनी मातीच्या वाट्यांमधील चिकन सुप ढवळत आणि दुसऱ्या हाताने बिअरचा सिप घेत काहींच्या गप्पा सुरु होत्या.

या सर्व बाजारात रफिक कावरे बाबरेपणाने उभा होता. चिकन सुप त्याला आवडत नव्हते अशातला भाग नव्हता, पण आज कंपनीतील तिसरा दिवस आणि लगेचच वरिष्ठांच्या बरोबरीने पार्टी त्याच्या अंगवळणी पडत नव्हती. आत्तापर्यंत फारसं उच्चभ्रू शहरी वारं न लागल्यानं त्याला सारं काही कृत्रीम कृत्रीम वाटत होतं. काही तरी खुपत होतं. एक वेगळीच अस्वस्थता, अधुरेपणा त्याला सतावत होता. नदीच्या डोहात भर उन्हात उंडारणाऱ्या म्हशींच्या कळपात एखादं भित्रट कोकरु अडकावं, तशी त्याची अवस्था झाली. या उंची पार्टीत तो बाहेरचा नव्हता, पण अद्याप आतलाही झाला नव्हता. पाण्यात उतरुनही तो पूर्ण कोरडा होता. पार्टी बॉय डॉ. पटवर्धन साहेब सर्वाना मद्यपान करण्याचा आग्रह करत फिरत होते. अचानक त्यांचे लक्ष रफिककडे गेलं. पार्टीत सहभागी झालेल्या सुमारे 80 जणांमध्ये फक्त या एकमेव पोराने अद्याप मद्यपान सुरु केलेले नाही, हे त्यांच्या चाणाक्ष नजरेने लगेच हेरलं. त्यांनी हाक मारली, ""ओ जंटलमन !!! कम हिअर.''

""क्‍या हुआ. कुछ कमी रह गई क्‍या.'' डॉ. पटवर्धन आपल्या खर्डेदार आवाजात रफिकला म्हणाले.

""नही सर, सब कुछ बहुत अच्छा है.''

""तो फिर तुम पी क्‍यो नही रहे. ये बात ठिक नही यार, चलो आ जाओ हम दोनो चिअर्स करते है.''

""स्‌ स्‌ सर मी य्‌ंत कधीच घेतलेली नाही. स्वारी सर, पण मी घेऊ शकत नाही. तुम्ही घ्या सर. मी थम्स अप घेतो.''

""अबे तु नक्की ऍग्रीकॉस आहेस ना? म्हणे घेवू शकत नाही. कलंक आहेस तू सर्व ऍग्रीकॉसला. तुला काय वाटतं, कंपनीत काय फक्त तु एकटाच सज्जन आहेस? आम्ही सर्वजन बेवडे आहोत? ऍगीकॉसनं कसं सिंहसारखं आपल्या मस्तित रहावं. कामाच्या वेळेला काम आणि एन्जायमेंटच्या वेळेला एन्जॉयेट. इथं बघ सगळे मस्तपणे इन्जॉय करत आहेत. मी तुझ्या बापापेक्षाही जास्त वयाचा आहे. त्यामुळे माझं ऐक बेटा, हीच वेळ आहे. एन्जाय कर. उद्यापासून तुझं काम आहेच. मग तुझे बॉस शिव्या घालून तुझ्याकडून सेल्स करुन घेतील. नाऊ जस्ट एन्जॉय यार. चल आजची रात्र माझ्या नावाने सेलिब्रेट कर. लेट्‌स चिअर्स.''

""नही सर मी नाही पिऊ शकत. सर प्लिज, तसं नाही पण मी कधीच पिलेलो नाही.'' रफिक.

""अबे तू ? साल्या मी तुला एवढे हात जोडले. तू आमच्यापेक्षाही शहाणा झाला का रे ?'' समजून सांगूनही रफिक घेत नाही हे पाहून डॉ. पटवर्धनांनी आता आपल्या अधिकाराचा हुकमी एक्‍का बाहेर काढला. ""आयुष्य गेलं आमचं मार्केटींगमध्ये. कुणी कधी नाही म्हणालं नाही मला आणि तू मला अव्हेरतोस. आज कंपनीतील माझा शेवटचा दिवस, असा अपमान करतोस काय माझा. काय तुझी पोस्ट काय आपल्या कंपनीत.?''

""सर मी टेरोटरी मॅनेजर आहे''

""कधी पासून ?''

""सर दोनच दिवस झालेत.''

""ह्‌ं दोनच दिवस झालेत आणि तरी एवढा तोरा !!! गाव कोणतं तुझं''

""सर जुन्नर, नारायणगाव.''

""अरे तुम्ही पुण्या-नाशिकवाले तर साऱ्या जगाला वाईन, बिअर पाजता आणि पिण्याची टेस्ट नाही अजून. शाम्पेनवाले शामराव चौगुले तुमचेच ना आणि किंगफिशरवाल्या विजय मल्यांची वायनरीपण तुमच्याकडेच ना? उद्या जर विजय मल्यानं तुला त्याच्या बाजरीपासून तयार केलेल्या बिअरचा राज्याचा विक्री प्रमुख केला तर न पिताच विकशील काय? बेटा मार्केटींग आणि मॅनेजमेंट लेक्‍चरला बाकडे रंगवून आणि वन नाईट शो करुन येत नाही. ते अंगात मुरावं लागतं, जगावं लागतं. समोरची व्यक्ती तिचा कल पाहून वागावं लागतं. एखाद्या दगडाकडूनही अपेक्षित काम करुन घ्यावं लागतं. तू आत्ता वागतोयसं त्यावरुन मार्केटींगमध्ये तुला भविष्य आहे, असं वाटंत नाही, पाहू किती दिवस टिकतोयस आणि कसं काम करतोस ते.''

एव्हाना सगळी पार्टी रफिक आणि पटवर्धनांभोवती जमा झाली. अनेकांच्या फेसाळलेल्या प्याल्यांतील बुडबुडे ओठांच्या स्पर्शाशिवायचं शांत झाले होते. याने रंगाचा बेरंग केला, या भावनेने सर्वजण रफिककडं पाहत होते. त्यालाही अपराध्यासारखं वाटू लागलं. सर्व बाजूंनी दबाव वाढत असूनही अतापावतो आपल्या नकारावर तो ठाम होता. पार्टीचे निमंत्रण मिळाल्यापासून त्याला याच बाबीचा धसका होता. आता मात्र धसक्‍याचा पोटशुळ झाला होता. पायातील तुटक्‍या बुटाच्या शेंड्याला अंगठ्याने टोकारत तो डॉ. पटवर्धनांसमोर खाली मान घालून उभा होता. ते मात्र या नवख्या पोरासमोर हार मानायला तयार नव्हते.

डॉ. पटवर्धनांनी आता त्यांनी शेवटचा वार केला... ""ये आता बस्स झालं. चल निघ इथून. ये चला निघा सगळे. पार्टी बंद. हा घेत नाही मग काय अर्थ आहे.'' आता मात्र रफिकच्या पायाखालचं गवत सरकलं. त्याच्या शेजारीच उभ्या असलेल्या त्याचे वरीष्ठ अधिकारी पी राजेंनी त्याला लगेच चिमटा काढला. हतबल झाल्यानं रफिकनं सरळ पटवर्धनांचा हातच धरला. ""स्वॉरी सर, आय एम रिअली स्वारी, तुम्हाला दुखविण्याचा उद्देश नव्हाता. मी लगेच घेतो सर.'' ""यस !!! ये हुयी ना बात.'' डॉ. पटवर्धनांनी प्रदिर्घ झटापटीनंतर विजयी झालेल्या मल्लाच्या आवेशानं रफिककडं पाहीलं. तो घामेजला होता.

""तु नशीबवान आहेस. आयुष्यात पहिल्यांदा पितोयस आणि ते ही एवढ्या मोठ्या लोकांच्या पंगतीला बसून. सुरवातीला थोडं कडवट लागेल मग हळू हळू मजा येईल. घे. काय घेणार? बिअर, रम, जिन? अरे, पहा हा कोणती घेतोय ते.'' सर्वाना सुचनावजा आदेश सोडून साहेब आपला पेला उंचावत बारच्या दिशेने वळले आणि रफिकने धसक्‍याचा सुस्कारा सोडला. मात्र पिण्याला हो म्हणून आगीतून फुपाट्यात पडल्याची जाणिव त्याच्या अंगावर काटा आणून गेली.

गेल्या सात वर्षात चालून आलेले मोहाचे शेकडो क्षण त्याच्या डोळ्यांसमोरुन क्षणार्धात चमकून गेले. पदवीच्या चार वर्षात समुद्राच्या खाऱ्या वाऱ्यात आणि काजू फेणीच्या सानिध्यात राहूनही रफिकनं कधी फेणीला हात लावला नाही. प्रयोगशाळेत अनेकदा वाईन तयार करुनही तिच्या थेंबाला कधी जिभ लावली नाही. हर्णेच्या धक्‍क्‍यांवर आणि गणपती पुळ्याच्या पुळणीवर वाळूत पसरल्या पसरल्या "अरे कुत्र्यांनो दारु पिऊ नका, मरसाल' असे मित्रांना शेकडो वेळी जिव तोडून सांगितलं होतं. मित्र घ्यायचे आणि हा त्यांचा चकणा संपवायचा. एखाद्याचा टांगा पलटी आणि घोडे फरार झाले, तर हा त्यांना खांदा देत सावरत होस्टेलवर घेवून यायचा. त्यामुळं त्यांनाही तो हवा असायचा. आज मात्र त्याला इथं खांदा देणारं इथं कोणी नव्हतं.

राजेंनी प्याल्यात किंगफिशर ओतली आणि प्याला त्याच्या हाती दिला. एव्हाना रफिकची मानसिक तयारी झाली होती. चिअर्स यंग मॅन म्हणत राजेंनी आपला प्याला उंचावत त्याच्या पेल्याला भिडवला. पार्टी आपल्या मस्तीत दंग झाली होती. रफिकनं मान फिरवून दात ओठांवर घट्ट दाबत डोळे मिटून प्याला ओठाला लावला. आभाळ दाटलं. डोकं, कान, नाक भरुन आलं. ओठांवरील प्याल्यात डोळ्यांतून मुक्तपणे ओघाळणारी आसवं लपवित त्यानं बिअरचा घोट घशाखाली उतरविण्यास सुरवात केली. बंद डोळ्यांतील बुबुळापुढं शाळेत गाडगेमहाराजांचा व्यसनमुक्तीचा धडा शिकविणारे वडील आणि चुलीवर भाकरी थापता थापता ""बाळा सगळं कर पण आयुष्यभर बाटलीला हात लावू नको!'' असं वारंवार सांगणारी आई चमकून गेली. डोळ्यांतील आणि घशातील वाढता कडवटपणा काळजापर्यंत सलत गेला...

4 comments:

leena said...

no words to express...
wachatana kaljala kharach bhidali

vihang ghate said...

Excellent blog post...
Lay Bhariiiiii

Nilesh Ware said...

Reality in marketing........
And in Life also...........
Nice Bhau....

Rahul said...

Very Heart touching.
:-)